सुस्वागतम.

ज्ञानगंगा (एक शैक्षणिक चळवळ) या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे

माझ्या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत

Monday, 1 June 2020

माझी_व्यथा...


              एक संघर्षमय बालपणाची कहाणी...

                ९ ऑगस्ट क्रांती दीन, अन् बोरुडे परिवाराचा सुद्धा क्रांती दीन याच दिवशी माझ्या स्वरूपात या परिवाराला वारसदार मिळाला..सर्व कुटुंबात आनंद दरवळत होता...मुलगा म्हटलं की आनंद हा होणारच तब्बेतीन खुप गुबगुबीत व सुदृढ असल्यामुळे सर्वांच्या नजरा भिडत होत्या...लहान बाळ म्हणल्यावर घरात नेहमी आनंदाचे वातावरण राहत असे.मी सर्वांचा लाडका झालो होतो.. जेमतेम एका वर्षाचा असताना, मी नेमकेच पाय टाकायला सुरुवात केली, अन् अचानक मला ताप भरला....ताप खुप भयानक होता कदाचित १०४ डिग्री सेल्सिअस असेल..आई वडीलांना काय करावे ते सुचेना त्यांनी गावात असलेल्या DHMS डॉक्टरला मला दाखविले..त्यांनी मला तपासणी करून दोन्ही साईडला सुई टोचली... अन् थोड्या वेळातच होत्याचे नव्हते झाले..माझ्या दोन्ही पायांनी पाय धरणे सोडून दिले...अचानक माझे दोन्ही पाय लुळे पांगळे झाले...आईने वडिलांनी मला पाहून टाहो फोडायला सुरुवात केली...डॉक्टर सुद्धा भयभीत झाले... आमची परिस्थिती खुप बिकट व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारी अन् काही दिवसापूर्वीच या गावात वास्तव्याला आलेलो असल्यामुळे वडिलांना तिथे काही अँक्शन घेता आली नाही. जास्त वेळ न लावता मला दुसऱ्या चांगल्या दवाखान्यात दाखल केले..परंतु काहीही उपयोग झाला नाही..ती ताप नसून पोलिओ आजाराची लक्षणे होती...आणि तिथेच घात झाला.. अन् मी कायमचा  अधु झालो...आता माझ्यासोबत जन्माला आलेली मुले रस्त्याने जोरात धावत होती..मला ते सर्व दिसत होते.माझी सुध्दा धावण्याची इच्छा होत होती...परंतु ते शक्य होत नव्हते..पायावर कसल्याच प्रकारे उभे राहता येत नव्हते.दिवस कटत होते तसा मी सुध्दा मोठा होत होतो..आई वडिलांनी मला चांगले करण्यासाठी मोलमजुरी करून अनेक दवाखाने पायाखाली घातले होते.पण गुण काही येत नव्हता. दवाखान्यात गुण येत नसल्यामुळे आता अंधश्रद्ध ने दुसऱ्याच्या सांगण्यावरून वडिलांच्या मनात जागा घेतली होती. अमुक केल्याने बरा होईल तमुक केल्याने बरा होईल तसे अनेक प्रयोग माझ्यावर सुरू झाले..त्यातील एक प्रयोग तर खुप त्रासदायक होता..तो म्हणजे शेळीची विष्ठा असलेली लेंडी खत जिथे टाकल्या जायची त्या ठिकाणी पूर्ण शरीर बसेल असा खड्डा खोदून त्यामध्ये अगदी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नित्यनेमाने १० दिवस पूर्ण मला पुरल्या जायचे.फक्त आणि फक्त माझे डोके तेव्हढे वरी रहायचे.अक्षरशः मला आत मध्ये खुप चटके बसत होते.जोरजोराने रडायला येत होते..माझे रडणे खुप व वेदनादायी असल्यामुळे आई वडिलांना ते बघवत नव्हते..पण हा उपाय केल्यामुळे मी बरा होईल ही अपेक्षा ठेऊन ते होते...इथे सुद्धा त्यांचा अपेक्षा भंग झाला...नंतर आईवडिलांनी खुप देवाच्या वाऱ्या (नवस) केले.. अंबेरी यवतमाळ जिल्ह्यातील ठिकाण या ठिकाणी दररोज मला पाच दिवस दर्शनाला घेऊन जायचे..ते सुद्धा सकाळी सकाळी चार वाजता बाजूला वाहत असलेल्या नदीत थंड पाण्याने अंघोळ घालुन..इथे सुद्धा भ्रमनिरास झाला..आता मी सहा वर्षाचा झालो होतो.. माझ्या शिक्षणाची चिंता आईवडिलांना सतावत होती,मला चालता येत नसल्यामुळे माझे शिक्षण कसे होईल यामुळे ते खुप चिंतेत होते...त्यावर उपाय काढत गावातील जिल्हा परिषद शाळेत माझा प्रवेश नक्की केला. व मला दररोज उचलुन शाळेत नेऊन बसवले व माझ्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला...लवकरच मी पाटी गिरवायला व अक्षर वाचन करायला सुरुवात केली..आई वडील दोघेही शिक्षित असल्यामुळे त्यांना माझ्या या अभ्यासुवृती कलेचा आनंद झाला..मी थोडासा गुणी तर होतो.पण त्यापेक्षा जास्त अवगुणी होतो. घरापासून शाळेचे अंतर ५०० मीटर एव्हढे होते.ते मी टोंगळ्यावर पार करत घरी येऊ लागलो. ...तिथेच माझ्या जिद्दीची वडीलांना प्रचिती आली ... अन् त्यांनी मुखातून जिद्दी आहेस हा शब्द काढला. वयाचे ९ वर्ष पार केले होते..पायाचे टोंगळे गुडघ्यावर चालू चालू रक्तबंबाळ होत होते..तेंव्हा वडिलांनी मला पुराण्याची (बैल गाडीवर बैलाला टोचण्यासाठी जी काडी असते..) त्या पासून काठी तयार करून दिली.. अन् त्यावर हळू हळू तिचा आधार घेत मी चालायला शिकलो...आता तर मला पाय फुटले होते..नुसते चालणेच नाही तर मी पळायला लागलो होतो...(अर्थात पडत सुद्धा होतो) पण मागे फिरून पाहिले नाही...कारण डर आगे जीत है. काडी मिळाल्या पासून मी घरात कमी आणि खेळायला जास्त जात होतो..चिंचोके,कोई, गोटया,क्रिकेट इत्यादी  हे सर्व खेळ अगदी सर्वांना लाजवेल असे मी खेळत होतो...वडिलांनी हे सर्व हेरले होते...त्यांना माझ्या खेळण्याचे काही वाटत नव्हते पण भविष्याची जास्त चिंता होती...म्हणून त्यांनी मला लवकरच वयाच्या ११ व्या वर्षी स्वतः पासून (काळजावर दगड ठेवून) दूर केले अन् पुढील शिक्षणासाठी औरंगाबाद येठील वसतिगृहात  टाकले....आई वडिलांसाठी ही गोष्ट वेगळीच होती. वसतिगृहात माझ्यासारखी असंख्य मुले पाहून आईच्या डोळ्यातून अश्रु अनावर झाले.पण वडिलांनी आईला हिम्मत देत त्याच्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे..तु तुझे अश्रु अनावर होऊ देऊ नकोस नाहीतर याला घरी परत घेऊन जाऊ..असे शब्द पडताच आईचे रडणे थांबले. तिथे माझ्या सारखेच भरपुर मुले होती.. तिथुनच जवळ असलेल्या महानगर पालिकेच्या शाळेत माझे पाचवीला एडमिशन झाले होते...हॉस्टेल मधून आम्हा सर्व मुलांना गाडीने शाळेत सोडले जायचे..शिक्षण चांगल्या दर्जाचे मिळायला सुरुवात झाली...वसतिगृहात सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे खाण्यापिण्याची काळजी घेत होते.. शिक्षण आणि खेळ यामध्ये आम्ही कधीही माघार घेतली नाही..क्रिकेट तर अगदी आवडीचा खेळ होता.वस्तीगृहाच्या टेरेस वर आमचा क्रिकेट सामना नेहमी रंगायचा..बॅटिंग करत असता लवकर आऊट न होणारा मी, नेहमी जोरात बॉल मारल्याने एखादी कुंडी माझ्याकडून फुटायची.मग मात्र त्या रागाच्या भरात आमच्या वसतीगृहाचा मॉनिटर मला फोडायचा..आमची मस्ती खुप रंगायची अन् मार पण तेव्हढाच भेटायचा... वयचं होते ते..त्या वयात दंगा मस्ती ही आलीच..एक वेळेस तर पलंगावर (कॉट) पकडापकडी खेळ खुप रंगला (जवळपास मोठ्या हॉल मध्ये ४० पलंग असतील )..या वर आमची धावपळ सुरू झाली..एकमेकांना पकडत असताना अचानक माझ्या डोक्याचा भाग पलंगाच्या कोपऱ्यावर धडकला आणि मी खाली बसलो..माझे डोके फुटले होते. डोक्यातुन रक्तस्त्राव सुरु झाला..वसतिगृहाची सिस्टर ने मला ताबडतोब घाटी (औरंगाबाद मधील प्रसिद्ध दवाखाना.) येथे admit केले..माझ्या डोक्यात दोन तीन टाके घालायचे काम पडले..परत येता वेळेस सिस्टर ने माझी चांगली कानउघाडणी केली,तेंव्हापासून माझ्या अतिउत्साही उनाडकीला ब्रेक लागला...माझे खेळणे कमी झाले. शिक्षणात चांगल्या प्रकारे रस निर्माण झाल्यामुळे शाळेत नेहमी चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊ लागलो.सातवी पर्यंत तिथे शिक्षण पूर्ण झाले.अपंग पुनर्वसन अंतर्गत हे वसतिगृह असल्याने वसतिगृहातील अस्थिव्यंग मुलांचे ऑपरेशन करण्याचे अधिक्षक यांनी ठरविले होते..अनेक मुलांचे ऑपरेशन झाले होते..परंतु ऑपरेशन नंतर ते वेदनेने विव्हळत होते.त्यांची ती परिस्थिती बघून वडिलांनी माझे ऑपरेशन न करण्याचे ठरविले... अन् तिथे माझा औरंगाबाद मधील शिक्षणाला बाय बाय झाला...आता आठवीत कुठे शिक्षण घ्यायचे याचा विचार करत असतानाच गावातील वसंतराव नाईक विद्यालय येथील शिक्षकवृंद घरी आले.. अन् गावातीलच शाळेत (विद्यालयात) माझे माध्यमिक शिक्षण सुरू झाले.औरंगाबाद येथून उच्च प्राथमिक शिक्षण पूर्ण करून आल्यामुळे गावातील मुलांनी समोरच्या बेंचवर बसायला जागा दिली..थोडीशी हुशारकीची चुणूक दिसल्यामुळे येथे माझे अनेक मित्र झाले..त्यापैकी,सुनील,किशोर, भिका,प्रकाश हे माझ्या गळ्यातले ताईत झाले.अगदी जीवाला जीव देणारे हे माझे मित्र कोणतेही चांगले वाईट कृत्य करायचे असले की आम्ही सर्व सोबतच असायचो...त्यामुळे शाळेत जर एखादी घटना घडली तर सर्वात पहिले आम्ही जिम्मेदार असायचो..आणि शिक्षकांचे सुद्धा आम्हीच गुन्हेगार असायचो..त्यामुळे सर्वप्रथम शिक्षेला पात्र आम्हीच.एक वेळ असाच एक प्रसंग शाळेत द्वितीय सत्राचे पेपर सुरू झाल्यावर घडला आम्ही त्यावेळेस इयत्ता नववीत होतो.झाले असे की,पेपरचे वेळापत्रक आम्हला मिळाले होते.नियमित वेळापत्रकानुसार पेपर चालू होते..पहिला पेपर मराठी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी इंग्रजी पेपर होणार म्हणून आम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला..परंतु काही कारणामुळे त्या दिवशी शाळेला सुट्टी देण्याचे काम पडले..आमचा पेपर झाला नाही,मात्र आजूबाजूच्या गावात तो पेपर झाला आणि तिथे आमच्या गावातील काही मुले शाळा शिकण्यासाठी जात होते.त्यामुळे त्या पेपर ची प्रश्नपत्रिका आम्हला घरपोच मिळाली अन् प्रश्नपत्रिकाच हातात आली म्हंटल्यावर बाकीच्या मित्रांसाठी ती पर्वणीच ठरली..आता सगळ्यांना पेपरची भीती नाहीशी झाली..आम्ही आनंदात पेपर देण्यासाठी दुसऱ्यादिवशी शाळेत पोहचलो..परिपाठ पूर्ण झाला अन् गुरु ते गुरूच असतात त्यांनी परिपाठ संपल्यावर सूचना दिली आज इंग्रजी पेपर होणार नाही.त्या बदली विज्ञान पेपर होईल..आमचे तर आता धाबेच दणाणले होते..आमच्या आनंदावर विरजण पडले..आम्ही सर्व वर्गात बसलो आणि आमचे खलबत सुरू झाले. अन् विचारविनिमय झाल्यानंतर आज आपण इंग्रजीचा च पेपर द्यायचा दुसरा नाही हे ठरले.शिक्षक विज्ञान चा पेपर घेऊन वर्गात आले मी समोरच्या बेंचवर बसत असल्यामुळे सर्वात पहिले पेपर माझ्या टेबलवर आला अन् ठरल्याप्रमाणे मी पेपर घ्यायला नकार दिला.सरांनी माझ्याकडे पाहून मुखिया बनू नकोस असे उद्गार काढले आणि पुन्हा वर्गात पेपर वाटायला सुरुवात केली थोडा वेळ तर कुणीच पेपर घेतले नाही.सरांनी थोडे वर्गात भीतीदायक वातावरण तयार केल्यानंतर सर्व मुलांनी पेपर घेतले..पण सरांनी मलाच पेपर दिला नाही.इथेच राजकारण काय असते ते कळले तेथुन पुढे मी कधीच असल्या बाबतीत पुढाकार करणार नाही ही शपथ घेतली..तो दिवस माझ्यासाठी खुपचं आठवणीत ला दिवस..ही घटना सरांनी वडिलांना जसाच तशी थोडी तेल मीठ लावून सांगितली त्यामुळे घरातील वातावरण एव्हढे तापले की वडिलांना मला धो धो धोपटले.. अन् माझ्या फिरण्यावर अंकुश आला..हे माझे किशोरवयीन वय होते..त्यामुळे घरात काही मन रमत नव्हतं...असे अनेक प्रसंग आठवणीतले यातच आता मी दहावी उत्तीर्ण झालो... पुन्हा आता एकदा पुढील शिक्षणासाठी कोणता विषय निवडायचा कुठे शिक्षण घ्यायचे हा प्रश्न समोर आला..त्याच उन्हाळ्यातच मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते.भाऊजी औरंगाबाद येथे राहत असल्यामुळे माझ्या पुढील शिक्षणासाठी मराठवाड्याची राजधानी सज्ज झाली आणि मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स इथे माझे एडमिशन झाले.कॉलेज खुप मोठे होते ,हा परिसर माझ्यासाठी अनोळखी होता.कॉलेज मध्ये कुणीही ओळखीचे नव्हते.माझा स्वभाव जरा ओळख निर्माण करण्याचा असल्यामुळे मी पाहिले मित्र जोडण्याचे काम केले.तसे मित्र जोडण्यात जास्त वेळ लागला नाही..परंतु भाऊजी जिथे राहत होते तेथुन कॉलेज तीन चार किलोमीटर अंतरावर होते..दररोज रिक्षा करून कॉलेजला जाणारे पडवरणारे नव्हते.सर्व मित्र चालतच हसत खेळत कॉलेजला पोहचायचे.मनात हा प्रश्न नेहमीच आपण चांगले असतो तर मला पण यांच्या सोबत मौज मजा करत जाता आले असते..मात्र मी स्वतःला कमी लेखायचे नाही असे मनात ठरविले आणि मी सुद्धा त्यांच्या सोबत त्यांच्या पाऊलाला पाऊल देत कॉलेज गाठू लागलो..नंतर कधीच स्वतःला कमी लेखल नाही...असे करत करत चांगल्या पद्धतीने ११ वी चे शिक्षण पुर्ण झाले आणि काही कारणास्तव १२ वी शिक्षणासाठी तालुका प्लेस गाठावे लागले... इथे माझा प्रिय मित्र सुनील शिक्षण घेत होता योगायोगाने त्याच्यासोबत रूम पार्टनर म्हणून राहण्याचा योग आला..तो तर माझा दुसरा पायच (माझा आधार) होता.दोघेही सायन्स मध्ये असल्यामुळे चांगल्या पद्धतीने अभ्यास होत होता..थोड्या दिवसातच १२ वी चे पेपर झाले.. अन् आम्ही उत्तीर्ण झालो...
           आता पुढे काय...?

                              क्रमशः

Monday, 18 May 2020

*_"व्यसन "म्हणजे काय रे भाऊ_?*

       व्यसन म्हणजे एक प्रकारे आपल्याला लागलेली सवय.. वेसन आणि व्यसन  या दोन शब्दाचा आपण विचार केला तर आपल्याला एक प्रकारे विरोधाभास जाणवेल..वेसन ही बैलाला लगाम घालण्यासाठी वापरलेली दोर होय..याचा अर्थ असा होईल की,बैल आपल्या आवाक्यात राहण्यासाठी आपण त्याला वेसन घालतो...पण हलीच्या पिढीला वेसन घालण्या अगोदरच व्यसन लागत आहे...
   खरंच व्यसन हे मानवाच्या प्रगतीतील मोठा अडथळा आहे. एकविसाव्या शतकात मनुष्य माहिती ,तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगतीशील युगाकडे वाटचाल करताना दिसतोय. मात्र व्यसन हा आजच्या मानवी प्रवृत्तीला जडलेल्या असाध्य रोग आहे. आजची पिढी ही आधुनिकतेचा  उज्ज्वल सूर्याची कास धरतो आहे. माणसाच्या असामान्य कर्तृत्वाचे कितीही कौतुक केले तरी कमीच पडते.परंतु याच कर्तृत्त्वाला आजच्या काळात व्यसन नावाचा रोग जडला आहे.
    आधुनिक युगामध्ये व्यक्तीची बुद्धी, ज्ञान, चिंतनशीलता, या सर्वांचा जलदगतीने विकास होताना दिसतो मात्र आपल्या क्षणिक सुखासाठी किंवा दुःखांचे दमन करण्यासाठी मानव व्यसनाच्या आहारी जातो,ही गोष्ट वाईट आहे. 
   प्रत्येक मानव हा जीवनात त्याला आनंद मिळावा या मनोवृत्तीचा असतो. विविध प्रकारचे खाण्याचे पदार्थ, कपडे, महागड्या गाड्या, मोठे घर,  वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य प्रसाधने, पर्यटन, कला, क्रीडा,  साहित्य असे आनंद  मिळविण्याचे विविध मार्ग उपलब्ध आहेत . काही जण असा आनंद मिळविण्यासाठी मादक पदार्थांचा आधार घेतात. या पदार्थांच्या सेवनाची सुरुवात जरी आनंदाचा शोध, मित्रांचा आग्रह, श्रमपरिहार, तणावमुक्ती, एखाद्या व्यथेला विसरणे, संगत,  अनुकरण वगैरे मार्गांनी झाली असली तरी यांचे होणारे दुष्परिणाम विनाशकारी ठरतात. 
   मादक द्रव्यांचे सेवन केल्यानंतर शरीर मनाची अवस्था ही अत्यंत आनंददायी असते, प्रत्येकाला आवडणारी असते. या अवस्थेत व्यक्तीची रसिकता बहरते, मनमोकळेपणा जाणवतो, कल्पनाशक्ती जागृत झाल्याचा आभास होतो, आपण खूप शक्तिशाली आहोत,शूर आहोत, असे वाटू लागते. हे सर्व अनुभव मानवी मेंदूत संग्रहित केले जातात . मग स्वाभाविकच असे अनुभव पुन्हा पुन्हा घेण्याची ओढ निर्माण होते. जे लोक जास्त संवेदनशील असतात, अशांच्या बाबतीत हे अनुभव घेण्याची ओढ इतरांच्या तुलनेत अधिक असते आणि अशा प्रकारची माणसे व्यसनाच्या आहारी जातात. 'व्यसन' म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात आनंद मिळावा म्हणून केलेला मानवी प्रयत्न किंवा अंगी जडलेली सवय. पण व्यसन हे फक्त आपण एक प्रकारची नशा किंवा लागलेली सवय म्हणूया. मग ती आपण फक्त वाईटाकडे म्हणजे मदिरा,गुटखा,तंबाखू व पुर्वापार म्हणजेच महाभारताच्या  किंवा रामायणामध्ये घडलेल्या घटना सुद्धा एक व्यसनाचा भाग होता. म्हणूनच महाभारत व रामायण घडले. हे तर रामायण महाभारत या पुराणातील घटनेचा आढावा घेऊनच कळते. परंतु आजच्या युगात किंवा एकविसाव्या शतकाचा विचार केलात तर व्यसन हे फक्त वाईट गोष्टींचेच असू शकते का ? जर प्रगल्भ विचार करण्याची पातळीचह जर पालकांनी आपल्या पाल्यास दिली तर व्यसन हे चांगल्या सवयींचे सुद्धा असू शकते. हे असावे असे अजिबात नाही. 
       व्यसन हे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक  केले तर लागते....कुणी अती वाचन करतो ,कुणी अती लेखन करतो, कुणी अती गायन करतो,तर कुणी अती नशा करतो..जिथे अती झाले तिथे व्यसन आले...याचाच अर्थ असा की, व्यसन हे दोन प्रकार मध्ये मोडता येईल..चांगले व्यसन आणि वाईट व्यसन..परंतु हल्ली आपल्याला चांगले  व्यसन असलेली माणसे  कमी तर  प्रमाणापेक्षा जास्त व्यसन करणारे जास्त दिसत आहे...मग आज आपण जर याकडे दुर्लक्ष केले तर येणारी पिढी ही व्यसनाच्या खाईत लोटल्या सारखे होईल. तेंव्हा आजच यावर निर्बंध लावणे गरजेचे आहे...आपण आपल्या आजूबाजूला बघितले तर,अगदी कमी वयातील मुले ही व्यासानाकडे खेचली जात आहे...चांगली गोष्ट शिकायचे म्हंटले तर थोडा वेळ लागतो,परंतु. व्यसन लागायला कसलाही वेळ लागत नाही...इथे घे रे थोडी ,,काय होत नाही म्हंटले की सुरू होते....नशा देणाऱ्या पदार्थाचे किंवा मादक पदार्थाचे सेवनाने मानवी शरीराच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊन गुंगी येणे,शरीराचे अवयव शिथिल पडणे,ग्लानी येणे विचारशक्तिचा र्‍हास इत्यादी प्रकार घडतात.याने मनावरील दडपण निघुन जाते किंवा कमी होते.या मादक द्रव्याची मग शरीराला सवय लागते.अश्या पदार्थाचे वारंवार सेवन करण्याची सवय म्हणजे व्यसन होय.
     व्यसनांचे शारीरिक दुष्परिणाम सिगारेट ओढणे, दारू पिणे, मादक पदार्थांचे सेवन करणे, मावा  खाणे इत्यादींमुळे फुप्फुसे, हृदय, जठर,  पचनसंस्था यांचे विकार होऊन कर्करोग  व इतर भयंकर रोग होतात. व्यसनांचे मानसिक दुष्परिणाम व्यसनांमुळे मन व बुद्धी अकार्यक्षम बनून मानसिक त्रास होतो. तसेच व्यसनांची पूर्तता करण्यासाठी बरेच पैसे खर्च होतात; म्हणून व्यसन म्हणजे ‘विकतचे दुखणे’ होय. . 
व्यसन म्हणजे जणू वाळवी
जी पोखरते शरीराला !
एकदा कां लागली की,
सुटका नाही त्याला...
     
        तेंव्हा वाईट व्यसनापासून दुर राहिलेले कधीही चांगलेच...


श्री समाधान दगडूबा बोरुडे
        प्राथमिक शिक्षक
    जि. प. प्रा. शाळा पेवा 
 📱📞  ९२७००१८३५३

Sunday, 10 May 2020

आई (एक मायेचा सागर)




              "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी"

     आई म्हणजे ममता,आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई. मायेची पाखरण करणारी एक स्त्री होय.एखादी स्त्री जेव्हा आपल्या  अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते. आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. मराठी भाषेतला "आई" हा शब्द मानवी भावनांशी निगडित असून त्यास माणसाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.आई मायेचा सागर आहे. आई !  आई हा शब्द ऐकला की प्रत्येकाला आठवते ती आपली जन्मदात्री आई! आईची महती एवढी मोठी असते की कितीही सांगा ती अधुरीच! 

" आईची ही माया, शब्दात होणे नाही

आईची ही ममता, शाईही पुरणार नाही 

आईची ही महती,काव्याला पेलणार नाही 

आईचा हा जिव्हाळा, लेखणीला झेपणार नाही"

ईश्वर प्रत्येकाच्या  घरात आईचा रुपाने वास करत असतो.
सर्वजण आईच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात. देवसुद्धा आईच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात. कारण आईच्या कुशीत माया, ममता ,लळा ,जिव्हाळा आणि प्रेम यांचा खजिना असतो, म्हणूनच आईला वात्सल्याचा महासागर म्हटले जाते.आईचं  बाळ कितीही मोठ झाल तरी तिला तो लहानच असतं.म्हणून दूर कामासाठी , नोकरीसाठी गेलेला मुलगा घरी परत आला की आई त्याच्या तोंडावरुन हात फिरवते.त्याला कुरवाळते. आणि आईच्या पाया पडण्यासाठी मुलाने माथा टेकला की आईचा ऊर भरून येते. व ती भरभरून आपल्या मुलाला आशीर्वाद देते. 'सदा सुखी राहा !'बाळ असं म्हणते. केवढी ती माया केवढे ते अफाट प्रेम.आई म्हणजे मंदिराचा उंच  कळस, अंगणातील पवित्र तुळस, भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, वाळवंटात प्याव अस थंड पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी पवित्र टाळी, आणी वेदनेनंतरची पहिली आरोळी. आई म्हणजे त्याग मुर्ती स्वतः उपाशी राहून आपल्या पिलास घास भरवते ती आई.खरंच ज्यांना आई असते ते किती नशिबवान असतात. म्हणूनच जोपर्यंत आई  आहे तोपर्यंत जीवनात रस आहे. कारण आईशिवाय जीवन म्हणजे उदास, भकास,भयानक आणि कुरूप आहे. आयुष्यभर आपली काळजी घेणारी आपली आई ही एक त्यागाची मूर्ती आहे. तिचं वर्णन कितीही केलं तरी थोडंच आहे.लेखणीत सामावणार नाही. आई खरंच महान आहे. माझासाठी वंदनीय, पुजनीय आहे. 

"काय सांगू  आई, तुला तुझी ग महती, 

तुझ्यासारखी नाही , कुणीच या जगती.

खरच आई ही आपल्या जीवनात कितीतरी भूमिका पार पाडत असते.  जीवनात डोकावून पाहाल तर त्या व्यक्तीच्या प्रगतीचे श्रेय त्याच्या आईकडेच जाते सुसंस्काराचे घडविणारी मार्गदर्शन करणारी, प्रेम करणारी, माया करणारी, तत्वज्ञान सांगणारी, खडसावणारी, चुका शोधून योग्य दिशा देणारी, मदत करणारी, लक्ष ठेवणारी, काळजी करणारी, जपणारी ती आई अशा कित्येक भूमिका आई पार पाडते. आईची जागा तिच्याशिवाय कोणीच घेवू शकत नाही.आईच्या महती बद्दल आपण ही कथा वाचली असेलच , ती की ठेच लागुन पडलेल्या मुलाला त्याच्या हातात असलेले आईच काळजी देखील विचारते, की बेटा तुला काही लागले तर नाही ना? यावरून आईचे काळीज आपल्या मुलाची किती काळजी घेते तर मग प्रत्यक्ष जीवनातली आई किती श्रेष्ठ असेल याची अनुभूती येते. पुत्र हा कधी ही कूपुत्र होवू शकतो, परंतु आई कधी कूमाता होवू शकत नाही. म्हणूनच म्हटल्या जाते की आईसारखी आईच....!  

     एव्हढ्या दुर जाऊन लोक
     करतात पंढरीची वारी...
     पण आईचे चरण हेच श्रेष्ठ
     माझ्यासाठी पंढरीहुन भारी...

                               ✍️
                 श्री समाधान द.बोरुडे
                   प्राथमिक शिक्षक

Wednesday, 22 April 2020

रायगड


टेस्ट सोडवण्यासाठी  इमेजला क्लिक करा.